

सलाहुद्दीन शेख
विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, उल्हासनगर ४ आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने गुह्यातील जप्त व रेकॉर्ड वरील बेवारस १३५ वाहनांच्या मुळ मालकांचा शोध लावण्याकरिता आवाहन…
विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे जप्त रेकॉर्डवरील / बेवारस वाहने पोलीस ठाणेच्या आवारात बऱ्याच वर्षापासून धुळखात पडून आहेत. उन, वारा, पाऊसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे. बऱ्याच वाहनावरील रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर गंजलेले आहेत. त्यामुळे शोध घेताना बरीच अडचण येत आहे. तसेच सदर ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने पोलीसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे दाखवून सात दिवसांच्या आत घेवून जावे अन्यथा पोलीसांकडून त्या वाहनांच्या लिलावाची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी केले आहे.
पोलीस ठाणेस शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रकीयेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडून आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे शहरचे पोलीस आयुक्त,आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण,अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग,संजय जाधव, परिमंडळ ४ उल्हासनगरचे पोलीस उप आयुक्त सचिन गोरे, उल्हासनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त/ अमोल कोळी यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेवून ती वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले आहेत. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार विक्रम गौड पोलीस निरीक्षक (गुन्हे) व पोहवा/१५६७ पाटील, पोना/२९३० लहामटे, पोशि/६२१९ घुगे यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले. त्यासाठी नमुद पथकाने परंदवाडी, तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे येवून सर्व वाहनांची पाहणी केली. वर नमूद अंमलदारांच्या मदतीने सर्व वाहनांचे चेसीस नंबर, इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनांचा मुळ मालकचा शोध घेणेकरीता प्रादेशिक परीवहन विभाग, मुंबई, ठाणे व कल्याण येथे पत्रव्यवहार करून मुळ मालकांचा शोध घेतला. गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहन मालकांना पत्र पाठविण्यात येणार आहे. तरी सदरच्या वाहन मालकांनी पत्र मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात येऊन आपले वाहन तपासुन खात्री करावी. आपल्या वाहनाचे कागदपत्रे दाखवुन योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून आठ दिवसांत विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथुन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तरी सदरची वाहने घेवून न गेल्यास लिलावाची कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे वरीष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पडवळ यांनी सांगितले आहे.